Protected by Copyscape

गुरुवार, २१ जुलै, २०२२

खेळणा किल्ला - विशाळगड



        राजधानी कोल्हापूर मध्ये स्थित शिलाहार कालीन स्वराज्याचा खंदा पहारेकरी म्हणजेच खेळणा  किल्ला .छत्रपती शिवाजी महाराजांनी बुद्धिचातुर्याने जिंकलेल्या किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे हाच तो 'विशाळगड'. आंबे घाटात वसलेला हा किल्ला पूर्वी कोकणातील रस्ते, कोकणातील बंदरे आणि कोल्हापूर बाजारपेठ ह्यावर लक्ष ठेवण्यासाठी  वापरला जात असे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांना सुखरूप बाहेर काढणाऱ्या शिवा काशीद , बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या बलिदानाची साक्ष देणारा हा विशाळगड नावाप्रमाणे विशाल आहे ह्याची प्रचिती किल्ला पाहिल्यावरच येते. किल्ल्यावर सध्या अतिक्रमण झाल्यामुळे विशाळगड गड कमी आणि गाव आहे असंच वाटतं,किल्ल्यावर होत असलेले गैर प्रकार आणि किल्ल्याची दुरावस्था पाहवत नाही म्हणून अनेक शिवभक्त ह्या किल्ल्याकडे जायला मागत नाहीत त्यांना एकच सांगावं वाटत कि जितकं जास्त दुर्लक्ष करू तितका त्रास वाढत जाईल...

        गुरुवार १४ जुलै २०२२ रोजी एक बातमी आली ' विशाळगडाचा बुरुज ढासळला ' आणि पूर्ण महाराष्ट्र आक्रोश करू लागला 'विशाळगड साद घालतोय , 'विशाळगड वाचवा!!' असे बरेचसे फोटो विडिओ सोशल मीडियावर वायरल झाले आणि दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी पुरातत्त्व खात्याकडून " विशाळगडाच्या तटबंदीचे वाटेवर ढासळेले दगड  वरती नेऊन ठेवण्यासाठी एक मोहीम राबवण्यात यावी " अश्या आशयाचे पत्र 'सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान' साठी रवाना करण्यात आले. दुर्गसंवर्धनाचा वसा हाथी घेतलेल्या सह्याद्री प्रतिष्ठानने अवघ्या एका दिवसात नियोजन करून रविवारी ५०० हून अधिक दुर्गसेवकांसोबत  यशस्वीरित्या हि मोहीम राबवली आणि सर्व दगड रणमंडळ टेकडी वर व्यवस्थित रचून ठेवले जेणेकरून पुढे हेच दगड बुरुजाच्या कामासाठी वापरता येतील. 

        माझी विशाळगडची वारी घडली ती ह्याच मोहिमेमुळे... शनिवारी रात्री मुंबईहुन प्रवासाला सुरवात झाली आणि    रविवारी  पहाटे ६.१० वाजता आम्ही २० दुर्गसेवक गडाच्या पायथ्याशी पोहोचलो आणि समोर विशाळगड धुक्यामधून डोकावताना दिसला. गड विशाल असला तरी प्रवासात येताना कुठूनही त्याचं दर्शन मला तरी झालं नाही. एक लहानसा पूल पार करून काही पायऱ्या चढून वर आलो कि उजवी कडे मुंढा दरवाज्याकडे जाणारा पायरी मार्ग आहे आणि डाव्याबाजूला लोखंडी शिडी मार्ग जिथला बुरुज ढासळला आहे. इथेच उजव्या बाजूला एक चौकोनी वीरगळ पाहायला मिळते, पावसाळ्यात शेवाळ आल्यामुळे हि वीरगळ लगेच दृष्टीस पडत नाही. ढासळलेल्या तटबंदी मधून एक लोखंडी पाईप खाली आलेला होता हा शिवकालीन नसावा हा पाईप कुठून आला माहित नाही तटबंदी ढासळण्यासाठी हा पाईप कारणीभूत असेल का असा प्रश्न पडलाय !!!

        आम्ही डावीकडे वळलो, काही दुर्गसेवक आमच्या आधीच गडावर पोहोचले होते त्यामुळे मोहिमेची सुरवात झालीच होती वेळ न दवडता आम्ही कामाला सुरवात केली. लोखंडी शिडीवर दुर्गसेवकांची एक साखळी तयार झाली होती. खाली असलेले सर्व लहान मोठे दगड एक-एक दुर्गसेवकाच्या हातातून वर सरकत होते वातावरण मध्ये वेगळाच जोश होता "हर हर महादेव !!" , "छत्रपती शिवाजी महाराज कि जय !!!" अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. आपल्यामागे कुणाचा तरी आधार आहे हे एकदा समजलं कि मन निर्धास्त होऊन जातं तसे आमचे गुरुवर्य आमचे आधार स्तंभ 'श्रमिक सर' आमच्या सोबत ह्या मोहिमेत सहभागी होते त्यामुळे सर्व निर्धास्त होऊन काम करत होते. काही दगड उचलत होते काही माती उपसत होते कुणी ह्या सर्वांना पाणी पाजत होतं आणि एक चिमुकली दुर्गसेवक दगड झेपत नाही ,कुणी मला दगड उचलू देत नाही म्हणून रुसून बसली होती. 

जवळ जवळ ५०० हून अधिक दुर्गसेवक ह्या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते उत्तम नियोजन आणि सर्व दुर्गसेवकांच्या मेहनतीमुळे  हि मोहीम अवघ्या ६ तासात पूर्ण झाली. 


        विशाळगड ढासळतोय म्हणून सोशल मीडिया वर लाखो लोक रडताना दिसले पण जेव्हा विशाळगडाने  बोलावलं तेव्हा मात्र सह्याद्रीचे  दुर्गसेवक झटताना दिसले. किल्ल्यावर घाण पाहवत नाही जिथे तिथे पडलेली हि कोंबडीची पिसं, बोकडांचा वास, सर्वत्र पसरलेला दुर्गंध सहन होत नाही  म्हणून आम्ही किल्ल्यावर जात नाही असे म्हणणारे हि काही आहेत त्यांना एकच सांगावंसं वाटतं  ' घाण साफ करायची असेल तर त्यात उतरावं लागतं ,किती पसरलीय त्याचा अंदाज घ्यावा लागतो. स्वतःचा श्वास कोंडून त्यात उतरलात तर आणि तरच किल्ला मोकळा श्वास घेऊ शकेल. जर आपण गेलो नाही तर किल्ल्यावर जागा विकणे आहे हे फलक बघून जे जातील ते एक एक तुकडा तुकडा करून किल्ला कधी विकत घेतील समजणार नाही. आणि विशाळगड विशाळगाव झाला म्हणून सर्व पुन्हा एकदा सोशल मीडियावर आक्रोश करत बसू आणि तेव्हा वेळ निघून गेलेली असेल..

    लोखंडी शिडी चढून रणमंडळ टेकडी वरून थोडं वर गेल्यानंतर समोरच एक दिशादर्शक फलक आहे ज्यात किल्ल्यावरील महत्त्वाच्या ठिकाणांचा नकाशा आणि नावं लिहलेली आहेत फलकाच्या बाजूलाच एक पायरीमार्ग आहे जो किल्ल्यावर जातो. अतिक्रमणामुळे किल्ल्यावर पुरातन वास्तूपेक्षा गावकऱ्यांची राहती घरं जास्त दिसतात बहुतेक घरांमध्ये खाणावळीची आणि राहण्याची सोय आहे गडावर काही दुकानं आहेत. पायरी मार्गावरून पुढे गेल्यावर डावीकडे एक पायवाट वीर बाजीप्रभू आणि वीर फुलाजीप्रभू यांच्या समाधी कडे जाते. वाट लहान आणि निसरडी आहे कदाचित कुणी जात नसावं जास्त म्हणून डागडुजी झालेली नसावी.पावसाचे पाणी वाहत होतं आणि वाटेवरच्या दगडावर शेवाळ जमा झाली होती, आम्ही सावधतेने इथून पुढे जात होतो इथून डावीकडे एक पायवाट जाते थोडं पुढे चालत गेलं कि समाधीचं दुरून दर्शन होतं .समाधीकडे जाण्याआधी आम्ही अमृतेश्वरच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो मंदिराकडे पाहून तिथे कुणी येत जात असावं वाटत नाही मंदिराच्या परिसरात प्लास्टिकच्या,काचेच्या बाटल्या आणि बराचसा कचरा साचलेला दिसतो. मंदिराच्या चारही बाजूनी चिखल जमा झालेला होता मंदिरासमोरच बाहेर बिल्व पत्राच्या झाडाखाली एक अर्धवट तोफ दिसते तोफेचा घेर पाहून ७-८ फूट पेक्षा मोठी असावी असा माझा अंदाज आहे. हि तोफ काही वर्षा पूर्वी मंदिराच्या डाव्याबाजूस जमिनीमध्ये अर्धवट रुतलेली होती. मंदिरासमोर एक छोटासा धबधबा खाली असलेल्या एका कुंडामध्ये कोसळत होता नयनरम्य दृश्य होतं. मंदिराच्या मागच्या बाजूने खाली एक पायवाट पाताळदरी कडे जाते एक लहानसा ओढा पार केला कि समोर वीर बाजूप्रभू देशपांडे आणि  वीर फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीचं दर्शन होतं या समाधीवर सह्याद्री प्रतिष्ठान कडून छत बसवण्यात आलेले आहे. ह्या वीरांच्या समाधी समोर नतमस्तक होऊन आम्ही पुढे निघालो. समाधीच्या अगदी समोर एक शिवकालीन प्राचीन विहीर दिसते हि विहीर बुजून गेली होती . सह्याद्रीच्या दुर्गसेवकांनी ती साफ करून उपसून तिला नवसंजीवनी दिली आता ह्या  विहिरीतील पाणी काचेसारखं स्वछ दिसत होतं, ह्या विहिरीत पाण्याचे जिवंत झरे आहेत  ह्या विहिरीतील ज्यादा पाणी वाहून जाण्यासाठी एक खिडकी आहे हे ज्यादा पाणी त्याच्या पुढच्या एका विहिरी मध्ये जमा झालेलं दिसते.

        इथून थोडं पुढे गेलं कि एक ओढा लागतो तो पार करून एक चढ चढून गेलं कि एक खोल दरी दिसते, उजवीकडे शिवकालीन पूल इतिहासाची साक्ष देत आजही उभा आहे. दरीत डोकावून पाहिलं तर इथेही कचऱ्याचा ढीग  दृष्टीस येतोच .

        आम्ही आलो त्या वाटेने न जाता दुसऱ्या एका पायवाटेने पुन्हा वरती गेलो जिथे डावीकडे वळण घेतलं तिथे आलो. हा मुख्य रास्ता इथून समोर मशिदी दिसतात असं पाहायला गेलं तर ह्या मशिदी कुठूनही नजरेस येतात पण येतानाच ठरवलेलं सर्व दुर्लक्ष करून एकदा किल्ला पाहायचा. मशिदीच्या दारातच एक ध्वज स्तंभावर जीर्ण झालेला भगवा दिसला आणि जणू तो आपल्याच प्रतिक्षेत तिथे ताटकळत उभा आहे असा भास झाला,  पण ठरल्या प्रमाणे सर्व दुर्लक्ष करून पुढे गेले इथून पुढे नरसिंह मंदिर आहे इथे जाणारी वाट चिखलाने आणि कचऱ्याने भरलेली होती. किती दुर्लक्ष करा पण हे प्लास्टिक आणि काचेचे रंगीबेरंगी तुकडे लक्ष वेधून घेत होते. किल्ल्याची दुरावस्था बघून जीव तुटत होता. ज्या कोनाड्यात पूर्वी दिवे लावले जात असतील तिथे आज बाटल्यांचा खच जमा झालेला दिसत होता. पुढे फक्त दर्गा दिसतो म्हणून आम्ही माघारी आलो तिथून पुन्हा दर्ग्या जवळ आलो तिथून उजव्या बाजूला एक रास्ता भोसले वाडी कडे जातो आम्ही त्या वाटेने निघालो इथे भगवंतेश्वराच्या मंदिराला लागूनच विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे आणि मागच्या बाजूला गणपती मंदिर आहे.

    भगवंतेश्वराच्या मंदिरा मध्ये डाव्याबाजूला समोरच छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती आहे उजव्या बाजुला ब्रह्मदेवाची मूर्ती दिसते. गाभाऱ्यासमोरच नंदी महाराज महादेवाच्या प्रतिक्षेत बसलेले आहेत. गाभार्याच्या एका बाजूला गणपती बाप्पाची मूर्ती आहे. मंदिराच्या बाहेर उजव्याबाजूला  एक गोमुख दिसत शंभू महादेवाच्या पिंडीवरून जाणार पाणी इथून बाहेर येतं. विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात विठ्ठल रुक्मिणी आणि गणपतीची  दगडी मूर्ती आहे. 

मंदिराच्या अंगणात ध्वज स्तंभ आहे ह्याच्या बाजूने एक वाट जाते तिथे एक अदृश्य पिंड आहे. 'चपला काढा आणि पुढे जा.' असं मंदिराची देखभाल करणाऱ्या काकांनी सांगितलं. आम्ही त्यांच्या सूचनेचं पालन करत चपला काढून पुढे गेलो उजव्याबाजूला  झाडझुडपांमध्ये लपलेली एक विहीर आहे जवळ जाऊन कट्ट्यावर उभे राहिले आणि खाली पहिले तर ह्या विहिरीचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे  हे कळलं. अदृश्य पिंडीचं कोडं उलगडलं, नकळत हाताच्या तर्जनीचा कपाळापासून ते ह्रिदयापर्येंत प्रवास झाला आणि मनोमन महादेवाच्या पाय पडले.

        विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या मागच्या बाजूला एक गणपती मंदिर आहे मंदिरा बाहेर एक वीरगळी आणि मंदिराच्या बाहेर डावी कडे एक तोफ ठेवलेली आहे. इथून पुन्हा मागे आलो कि एक वाट पंतप्रतिनिधींच्या राजवाड्याकडे जाते. वाड्याबाहेर चोकोनी तलाव दिशादर्शक फलक आहे इथून डोकावण्याचा मोह आवरून राजवाड्यात प्रवेश केला तर डाव्याबाजूला एक भुयारी मार्ग आहे. पायऱ्या उतरून गेल्यावर सुंदर चोकोनी विहीर दिसते आरश्यासारखं पारदर्शी निळे शार पाणी आजूबाजूला पावसामुळे वाढलेली हिरवळ त्याचं विहिरीतील प्रतिबिंब मनमोहक दृश्य ते हे!! एखाद्या चांदण्या रात्री इथे येऊन पाहिलं तर अवघे आकाश धरतीवर उतरलंय असच वाटेल !!! अशी कल्पना चित्र रंगवून तिथून मी बाहेर आले. राजवाड्याचे  काही अवशेष इथे दिसतात. इथून आलेल्या वाटेने माघारी गेलो ते मुंढा दरवाज्यापाशी दरवाज्याची एक कमान सोडली तर बाकी बांधकाम नवीन आहे हे स्पष्ट दिसून येत. दरवाज्यावर सुंदर नक्षी कोरलेली आहे. दरवाज्याला वरच्या बाजूला दोन दगडी पोकळ गोल दिसतात हयाचा वापर कडी /आडा  लावण्यासाठी केला जायचा. दरवाज्यातून पुढे तटबंदीवर जाऊन पाहिलं तर काही दुर्गसेवक तिथला कचरा साफ करताना दिसले. इथून आजूबाजूचा परिसर खूप सुंदर दिसत होता पण वेळे अभावी पटापट इथून पुढे उजवीकडे असलेल्या तोफेकडे वळलो तोफ साधारण ७ फूट पेक्षा मोठी असावी स्वराज्याची सेवा करून जणूकाही त्या दगडी चाहुतऱ्यावर भूतकाळातल्या आठवणी आठवून आता विश्राम करत असावी अशीच भासते.


        मुंढा दरवाज्यापासून सरळ चालत गेले कि उजवी कडे थोडी दूर एक वास्तू नजरेस पडते ती पहिले श्री.  राजाराम महाराजांचा सिंहगडी काळ झाल्यांनतर त्यांच्या पगडी समवेत सती गेलेल्या  महासाध्वी पत्नी श्री अहिल्याबाई  राणी साहेब यांची समाधी. समाधीच्या दगडावर पावसामुळे बरीचशी लहानलहान रोप उगवलेली होती दगडावर शेवाळ जमा झाली होती समाधी पर्येंत जायला साधी पायवाट नव्हती हि सल मनाला लागून राहिलीय. 



        पुन्हा मुंढा दरवाज्याकडून गड उतरायला सुरवात केली येताना दगडी पायरी मार्गाने उतरलो समोर विशाळगडाची भव्य तटबंदी दिसते पाण्याचा निचरा होण्यासाठी तटबंदीमधे त्रिकोणाकृती पोकळी आहे. खाली काही पायऱ्या उतरल्यानंतर दोन्ही बाजूला बसण्यासाठीचे कट्टे दिसतात काही लोक म्हणतात, इथे शिपाई बसत असत पण कुठे दिवे ठेवण्यासाठी कोनाडे दिसत नाही किंवा कोणत्या खोल्या पूर्वी असाव्यात असं दिसून आलं नाही. खाली उतरत असताना लक्ष वेधून घेतलं ते  डाव्याबाजूला असणाऱ्या दोन लाल चौकटींनी थोडं जवळ जाऊन निरखून पाहिलं असता त्या वीरगळी आहेत हे लक्षात आलं. आम्ही गड उतार झालो आणि परतीच्या प्रवासाला निघालो. विशाळगड पन्हाळ गड पाहायला जावा आणि बांदल आणि बाजींच्या रक्ताने पावन झालेल्या घोडखिंडीचे दर्शन न घेता माघारी जाणं म्हणजे वारीला जाऊन विठूमाऊलीच दर्शन न घेण्यासारखाच आहे. आम्ही परतीच्या वाटेवर या वीरांच्या पराक्रमापुढे नतमस्तक झालो पावनखिंडीत उभं राहून त्या काळी झालेल्या रणसंग्रामाचा विचार केला तर अंग शहारून आलं होत. शनिवारी १६ जुलै २०२२ सायंकाळी ७  वाजता ठाणे वरून सुरु झालेला हा प्रवास १८ जुलै २०२२ पहाटे ४ वाजता ठाणे मध्ये संपला. ह्या प्रवासात खूप सारे क्षण कॅमेरामध्ये कैद केले.नवीन ओळखी झाल्या काही गोष्टी नव्याने माहित झाल्या आणि इतिहासाबद्दल किल्ल्याबद्दलच कुतुहूल अजून वाढत गेलं.

        नावाप्रमाणे विशाल असलेला विशाळगड एका दिवसात पाहता आला नाही कोणताही किल्ला एका दिवसात पाहून होत नसतो आणि जितक्या वेळा या वास्तुंना भेट द्यावी त्या त्या वेळी हि नवीन इतिहासाची पानं उलगडत जातात. 

"किल्ला नुसता पाहायचा नसतो तो अनुभवायचा असतो इथला एक एक दगड इतिहास सांगत असतो फक्त तो ऐकून समजून घेता आला पाहिजे." असं माझं वयक्तिक मत आहे. 

ज्या ज्या दुर्गसेवकांनी ह्या मोहिमेमध्ये सहभाग घेतला त्यांचे मनापासून आभार !!!






मंगळवार, ५ जून, २०१८

दृष्टीकोण


कुणाला पाण्याचा ग्लास  
          अर्धा भरलेला वाटतो तर कुणाला अर्धा रिकामा 
दुसर्याचा आनंद पाहून 
           कुणाला आनंद होतो कुणाला ईर्ष्या 
कुणाला लहानशा गोष्टीत आनंद सापडतो  
           तर कुणाला सुखात हि कसली तरी उणीव भासते 
कुणाला स्वतःची दया येते आणि दुसर्याचा हेवा वाटत असतो 
           आणि कुणाला उलट दुसर्याची दया आणि स्वताचा हेवा वाटत राहतो 
निर्णय तर आपण सर्वच घेतो  
             काही विचार करून तर काही रागाच्याभरात 
परिस्थितीला सर्वच तोंड देतात   
               काही निर्भिडपणे तर काही भीतीने 
परिस्थिती सर्वांनासाठी सारखीच असते 
                बदल असतो तो तुमच्या "दृष्टिकोनात" 
आयुष्यात दुःखाची उजळणी करत राहिलो  तर सुखाचा धडा कधी सुरु होणार नाही 
आणि  दृष्टिकोण बदलल्याशिवाय परिस्थिति बदलणार नाही ………. 

पत्र

प्रिय आई ,

      सहा वर्षानंतर पत्र लिहतोय, आधी कधी इतकी आठवण आली असं नाही पण का कुणास ठाऊक आज हे पत्र लिहावसं वाटलं .
     कशी आहेस ?
     माझ्या पत्राला उत्तर मिळेल की नाही माहित नाही पण असशील तिथे सुखीच असशील , बाबापण असतील ना तिथे ते कसे आहेत ? छोट्या किमयाला तर त्यांनी पाहिलं देखील नाही, फारसे आठवत नाही पण जाताना ते म्हणाले होते  "आईची काळजी घे " तेव्हा माहित नव्हतं ती आमची शेवटची भेट असेल. बाबा त्या नंतर घरी आले ते तिरंग्यात लपटून, संपूर्ण गाव जमा झाला होता, सर्व रडत होते,ओरडत होते आणि तू किमयाला कुशीत घेऊन बाहेर आलीस डोळ्यात एक टिपूस पाणी नव्हतं, अभिमान होता तुला तुझा धनी देशासाठी शाहिद झाला. अंत्यविधी नंतर चार-पाच महिने लोक घरी यायचे,रडायचे. मला कधी समजलेच नाही माणूस मेल्या नंतर कशासाठी हा इतका आरडा-ओरडा . पण मी ,तुला कधी रडताना पाहिले नाही.
ह्या आधी आपल्या घरी कधी इतकी गर्दी पहिली नव्हती मी .
      बाबा गेल्या नंतर एक-दीड  वर्षांत तू मला आणि किमयाला घेऊन घर सोडल , किमया तेव्हा २ वर्षाची असेल आणि मी ७. आपण मुंबईच्या घरी आलो आधी सुट्टीत इथे यायचो तेव्हा मला मजा वाटायची ,पण आता मला गावाकडची आठवण यायची इथल्या शाळेत माझं मन कधी रमलंच नाही, पण हळूहळू मला सवय झाली. किमया आता मोठी होत होती.
    मला तुझी होणारी दमछाक बघवत नव्हती, पाळणाघरात किमयाला ठेऊन मला शाळेत सोडून स्वतः कामावर जायचीस पुन्हा घरी येऊन माझा आणि किमयाचा अभ्यास.अभ्यास कसला तिचा रोज नवीन नवीन गोष्टी सांगत बसयचीस तिला आणि मला 'अभ्यास कर अभ्यास कर ', सुट्टीच्या दिवशी बाबा न्यायचे तसं  बाहेर घेऊन जायचीस पण अजूनही समजत नव्हता तू आम्हाला कधी परत गावी का नेलं नाहीस ? तू म्हणायचीस मी मोठा झालो नौकरीला लागलो कि गावी जाऊन येऊ. मला खरंच अभिमान वाटतो तुझा, शाळेत सर्व जण म्हणायचे ,"my dad is my superhero".  पण माझ्यासाठी दोन्ही तूच होतीस बाबापण आणि आईपण "YOU ARE MY  SUPERHERO MOM . "
बघता बघता वर्ष कसे निघून गेले समजलंच नाही ,आता किमया शाळेत जायला लागली होती आणि मी कॉलेजला पण तुझा दिनक्रम ठरलेलाच. आमच्यातच गुंतलेली असयचीस कायम. स्वतःसाठी कधी वेळ देताना पहिलंच  नाही तुला. गावी होतो तेव्हा हळदी-कुंकू,मंगळा-गौर कधी कुठे सहजच मैत्रिणीं सोबत फिरायला जायचीस पण मुंबईला आल्यापासून आम्हीच तुझे विश्व् झालो होतो.
       कायम वाटत राहायचं एकदा का हे कॉलेज संपलं आणि जॉब मिळाला कि तुला कोणत्यातरी ग्रुपची मेम्बरशीप घेऊन देणार , आमच्या साठी खूप काही केलंस तू आता माझी वेळ होती तुझ्यासाठी काहीतरी करण्याची.
       बघता बघता शेवटचं वर्ष पूर्ण झाला interview दिला जॉब मिळाला सर्व ठीक होणार होत आता पुन्हा गावी जाता येणार होत. किमया आता कॉलेजला जाणार, आता सर्व जबाबदारी मी घेणार असं मनोमन ठरवतच होतो,
कामाचा चौथा दिवस होता तो जेव्हा तुझ्या ऑफिसमधून फोन आला, पण ह्या वेळी दुसऱ्या बाजूला तू नव्हतीस.
दुसरीकडून आवाज आला "तुझ्या आईला सिटी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आहे ताबडतोब तिथे ये ." हे वाक्य ऐकल्यावर पायाखालची जमिनच सरकली. सर्व स्वप्न एका क्षणात डोळ्यासमोर आली आणि  तसाच मी सिटी हॉस्पिटल मध्ये पोहोचलो वॉर्ड नंबर ३ मध्ये तू निपचित पडलेली डॉक्टरांना विचारल्यावर समजलं हृदविकाराच्या झटक्याने तुझा मृत्यू झाला. सर्व स्वप्न मातीमोल झाली. पुरता खचून गेलो. किमया रड-रड रडत होती, आणि त्या वेळेस माझ्या डोळ्यातलं पाणी कुठे गायब झालं माहित नाही, माझ्यावर सर्व जबाबदारी येऊन पडल्या होत्या अचानक जसं मी ठरवलं तसं काहीच झाला नव्हतं विचारच केला नाही कधी तू नसलीस तर आमचं काय होईल ? तुझ्याशिवाय जगणं कधी विचारच नाही आला हा मनात .तुझ्याभोवती आमचा विश्व् आणि तूच नाही तर संपूर्ण जग हरवून बसलो मी त्या एका क्षणात. माझा आयुष्य संपून टाकावंस वाटले पण किमया तिचं काय किमयासाठी जगायचं होतं मला आता तिच्यापासून माझं दुःख लपवून ठेवत आलो  कधी तिच्यासमोर तुझी आठवण काढून रडलो नाही. पण रात्र रात्र रडत असायचो तुझी खूप आठवण यायची आणि अजूनही येते.बाबा गेले तेव्हा तू अशीच रडायचीस का ग, तु देखील आमच्यासाठी strong होण्याचं नाटक करत आलीस का जस आज मी करतोय ??
         असं म्हणतात बापाच्या बुटात पाय ठेवले कि समजतं बापाचं दुःख काय त्याच टेन्शन किती पण तू गेल्यावर मला समजलं एका आईचं दुःख काय असत तिच्या मागे किती लचांड असतात. आता सकाळी उठवायला तू नव्हतीस, आयता डबा मिळत नव्हता , आईच्या हातचं जेवण काय हेच पुरता विसरून गेलोय आता मी . आता मी किमयाची आई मी दादा मी बाबा मी , तीन तीन भूमिका माझ्या वाट्याला देऊन निघून गेलीस अचानक अवेळी बाबासारखीच. पण खरं सांगू तर बाबा गेले तेव्हा इतकं दुःख नाही झाला जेवढं तू गेल्या नंतर झाले.
        आमचा आणि किचनचा संबंध फ़्रिज मध्ये खाऊ शोधायचा आणि पाण्याच्या बाटल्या भरून ठेवायचा इतकाच. सुरवातीला १० दिवस बाजूच्या काकी जेवण देत होत्या पण नंतर आमचं आम्हांलाच करायच होत, किमया मुलगी असून सुद्धा तू तिला कधी काही जेवण शिकवलंस नाहीस . मग माझं तर दूरच राहिला . सुरवातीला काही दिवस बाहेरून ऑर्डर करायचो पण बाहेर किती खाणार,मग नंतर मी YOUTUBE वरून व्हिडिओ पाहून जेवण शिकायला लागलो , किमयापण मदत करायची आणि हळूहळू तीच जेवण बनवायला शिकली आणि मी तिला मदत करायला लागलो.
         आज आम्ही दोघेही आपल्या क्षेत्रात यशस्वी आहोत.सर्व काही आहे पण तू नाहीस सोबत याचीच खंत जाणवतेय पत्र तुझ्याकडे पोचणार नाही माहित आहे पण कुठेतरी तुला हे सर्व सांगायचं होत म्हणून लिहून काढलं सर्व काही नाही पण जितकं जमलं तितकं.

    तुझी आजही आठवण येते आणि तुझी कमी आजही जाणवते.
   


























रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

आठवण

आठवण 

आज तुझी खूप आठवण येतेय.....
तू गेल्यानंतर पाहिल्यांदाच आज समुद्रावर गेले.
वर्ष झालं,तू मला सोडून गेलास 

आज समुद्र पहिला आणि पुन्हा तुझी आठवण आली..
याच वाळूत तासनं तास खेळात असायचो आपण,
 मी सोबत असले की तू हि लहान होऊन जायचास..
आणि याच किनाऱ्यावर माझा हात हातात घेऊन चालायचास...

 तुझ्या सोबत जूनचा पहिला पाऊस मी इथेच बसून पहिला होता 
आणि माझा हट्ट म्हणून तूही माझ्यासोबत भिजला होतास....

 आज समुद्रावर आले आणि सर्व काही आठवलं...
आजही सर्व तसेच आहे
          तोच समुद्र , तोच किनारा,
फरक एवढाच,तेव्हा तू असायचास सोबतीला ,
          आणि आज मी एकटी....
माझी किती काळजी असायची तुला
          म्हणून नेहमी माझ्या सोबत राहायचा..

 मग अचानक का रे सोडून गेलास मला एकटीला ?
Sunset झाला की घाई घाईने घरी घेऊन जायचास..
मी हट्ट केला की थंडीतही कुल्फी घेऊन द्यायचास..
आणि,"घरी आईला सांगू नकोस" बजावून सांगायचास.
आजही तसाच आहे हा समुद्र हा किनारा, सर्व काही 

फक्त तू नाहीस सोबतीला "बाबा"
असं मला एकटीला सोडून जाताना
काहीच कसं वाटलं नाही तुला ?

आज तुझी खूप आठवण येतेय..
"बाबा......" 

पहिलं प्रेम

शाळेच्या पहिल्या बाकावर ती बसायची ,
सर्व मुलींमध्ये तीच मला सुंदर दिसायची ,
जाता येता कधीतरी सोबत तिची असायची …
आणि मला पाहून उगीच  ती हसायची , ☺☻
दिसायला सावळी पण मनाने निर्मळ होती ,
मला कदाचित ओळखतही नसेल …. 
पण मनात माझ्या तीच होती ……. 
तिला पाहता यावं म्हणुन शेवटच्या बाकावर बसायचो ,
तिने मागे वळून पाहिलं तर मान खाली घालायचो ,
तिच्या सोबत बोलण्याची ओढ होती पण;
ती समोर आली कि मनाची पाटी कोरी व्हायची … 
कुणालाही भुरळ घालेल अशी तिची smile होती ,
reality मध्ये नसली तरी माझी dream queen तीच होती ☺ ☺
अशी ती माझी पहिली ' प्रेयसी ' होती .

बुधवार, १ मार्च, २०१७

दैनंदिनी - एक जपलेलं बालपण


 28 मे  2028 बाबा ची रूम आज साफ करत होतो आणि कपाटा वरून कसली तरी वही खाली पडली. बाबा ची डायरी होती , म्हणून कुतूहलाने वाचायला सुरु केली,
पाहिल्याच पानावर माझी जन्म तारीख बहुतेक माझ्या जन्मानंतर लिहायला लागले वाटतं
 आणि मी वाचायला सुरुवात केली ...


10 जानेवारी  1997

माझ्या सोनुल्यासाठी त्याच्या सर्व आठवणी जपून ठेवण्यासाठी ही डायरी लिहतोय ,

हॉस्पिटल बाहेर येरझाऱ्या घालत होतो. थोडा वेळ आधीच डॉक्टर येऊन सांगून गेले मुल आणि आई दोघांच्या जीवाला धोका आहे . आणि तुझ्या आईला ICU मध्ये नेलं. जीव कासावीस होत होता ICU चा दिवा विझला. जीवाला घोर लागला होता काय झालं असेल काय नाही तुझी आई कशी असेल माझं बाळ कसं असेल, काहीच सुचत नव्हतं, तितक्यात डॉक्टर बाहेर आले, "Congratulations मिस्टर अविनाश  तुम्हाला मुलगा झाला आणि बाळाची आई देखील सुखरूप आहे." डॉक्टरांचे हे शब्द कानावर पडले आणि जीवात जीव आला. 
मी बाप झालो. मला मुलगा झाला आज खूप खुश आहे मी , लगोलग जाऊन पेढे आणले हॉस्पिटल मध्ये सर्वांना  पेढे वाटले.
त्या दिवशी पहिल्यांदा तुला पहिलं, सफेद टॉवेल मध्ये गुंडाळलेला बाहुला वाटत होतास अगदी. माझीच द्रुष्ट लागते की काय माझ्या बाळाला असंच वाटत होतं .
 
15 जानेवारी  1997

पाच दिवसांनी  तुला आणि तूझ्या आईला घरी आणलं.
घर तुझ्या धुरीच्या वासाने दरवळून गेलं होतं. जिथे तिथे तुओले केलेले कपडे वळत होते, Dettol चा एक वेगळाच सुगंध  घरभर पसरलेला.

22 फेब्रुवारी  1997

आज माझ्या सोनूल्याचा बारसं. आत्या, आजी, आजोबा, काका,काकी ,मामा, मामी सर्व जमले होते तुझ्या बारशाला अगदी जोरदार झालं बारसं . "आदि" मोठ्या हौशीने ठेवलेलं तुझं नाव आम्ही. अविनाश आणि दीपालीचा "आदि" आमचा आदि .

10 जानेवारी  1998
आदिचा पहिला वाढ दिवस पण माझ्या बाळाला मागचे दोन दिवस खूप ताप होता  हैराण झालेलो आम्ही दोघेही.बाहेर कडाक्याची थंडी पडली होती आणि  तूझ्या आईच्या डोळयातून वाहणारे अश्रू काही थांबत नव्हते. रात्रभर तुझ्या उशाशी बसून डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवत होती. रात्रभर झोपली नाही ती आणि मी सुद्धा .

26 जानेवारी  1999

तुझा पहिला नंबर आलेला आज "सुदृढ बालक" स्पर्धेमध्ये खूप खुश होती तुझी आई. तुला आवडतात म्हणून बेसनाचे लाडू केले होते तुझ्यासाठी.

10 जून  2013 

तुझा 12 वी चा निकाल लागला.  ९६% गुण मिळाले होते  तुला. आज मला खूप आनंद झाला top 10 मध्ये आलास तू .शाळेत तुझा सत्कार झाला, तुझ्या 12 वी च्या क्लासच्या फी साठी आईने खूप कष्ट केले. माझी रिक्षा ड्राइवरची नोकरी हातावरचं पोट,पण तुझ्यासाठी शिवणकाम शिकली त्यातून तुझ्या शिक्षणाची अर्धी जबाबदारी तिने उचलली. तू जे काही करू शकलास ते आईमुळे.

15 जुलै 2013 

तापाची साथ पसरली त्यात तू  आजरी पडलास मलेरिया झालेला तुला आणि  माझ्या कडे फारसे  पैसे नव्हते तुझा इलाज करायला.  माझी ऑटो एकमेव जगायचं साधन त्यावर आपली रोजी-रोटी होती, नातेवाईकांनी पाठ फिरवली, कुणाचा आधार नव्हता, तेव्हा रिक्षा गहाण टाकली मी. तुझ्या उपचारा साठी सर्व पैसा खर्च केला. रात्र रात्र भर जागून तुझ्या आईने खाण्याचे पदार्थ, मसाले केले, घरोघरी जाऊन ते विकले त्यातून आलेल्या पैशातून घर चालवले. मागचे 15-20 दिवस खूप कठीण गेले.

12 सप्टेंबर  2017

तुला नोकरी मध्ये बढती मिळाली Manager च्या पोस्टवर काम करायला लागलास. माझा मुलगा कंपनी मध्ये Manager आहे  सांगताना आनंद होतो मला .

20 सप्टेंबर  2021 

तुझं लग्न झालं. सुनबाईला तूच पसंत केलंस. एकुलता एक म्हणून तुझा हा हट्टपण पुरवला. सुखासुखी तुमचा संसार सुरु झाला.  आमचे आशिर्वाद सदा तुमच्या सोबत आहेत .

12 ऑक्टोबर  2022

दिपालीची तब्येत जरा नाजूक होती . हॉस्पिटल मध्ये admit केलं तिला,तू मात्र तिला पहायला आला नाहीस. तू तुझ्या मीटिंग्स,पार्टी मध्ये Busy होतास आणि जेव्हा आलास तेव्हा तुझी आई नव्हती . तिच्या जाण्याने पुरता खंगलो मी. वाटलं सर्व सोडून निघून जावं दूर कुठेतरी पण तुझा चेहरा आला समोर आणि हिम्मत नाही झाली जाण्याची कुठे . प्रचंड राग आहे, माझा तुझ्यावर.  तिला पाहायचं होत रे शेवटच्या क्षणीे पण तू आला नाहीस, बिचारी अशीच निघून गेली कायमची. तुला कधीच माफ करू शकणार नाही मी. खूप कष्ट केले आम्ही म्हणून तू या मीटिंगला जातोस फिरतोस पार्टी करतो.

15 मार्च  2023
 
ऐकलं मी तुला सुनबाईशी बोलताना , वृद्धाश्रमात नेणार आहात ना तुम्ही मला खुशाल न्या रे , अडचण वाटते या म्हाताऱ्या बापाची नेऊन सोड रे बाबा मला तिथे. पण आता जे घर माझं आहे , माझं आहे ; करत फिरतोस ना , ते घर मी घेतलं, रात-रात  रिक्षा चालवून मिळेल ते काम करून.  का ? तर माझ्या मुलाने कुठेतरी खितपत पडून राहू नये म्हणून . जाऊ दे माझं काय तुझं काय. मी अजून थोडे दिवस जगेन मग तुझंच आहे की सर्व आता दिला काय नंतर दिले काय . लवकर सोड रे बाबा मला कुठे सोडतोस तिथे तुझ्या सुखासाठी आजवर खूप केलं ,आयुष्य सरता सरता तुला दुःख नाही द्यायचं रे बाबा .




पुढे काही वाचणार त्या आधी ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली आणि गेलो "पहाट वृद्धाश्रम" मोठा बोर्ड होता 5 वर्षा आधी इथे बाबाला शेवटचा पाहिलं होत नंतर फिरकलो नाही फक्त पैसे पाठवत राहिलो कधी विचारपूस नाही केली कधी फोन नाही .पण आज आलोय बाबांशी बोलायला नाही, तर त्यांना त्याच्या  हक्काच्या घरी न्यायला.....

रविवार, २५ सप्टेंबर, २०१६

पाऊस

पावसावर काहीतरी लिहावं म्हटलं ,
शाळेत जाणारी मुलं पाहीली आणि वाटलं ,
पाऊस म्हणजे शाळेची सुरवात नवी पुस्तकं,नवं दप्तर,
 नवे कपडे आणि नवीन दोस्त....

पावसावर काहीतरी लिहावं म्हटलं ,
टपरीवर चहा पिताना वाटले ,
छे!! पाऊस म्हणजे तर टपरीवरची कटिंग ,
एक प्लेट भजी आणि कट्ट्यावरचे मित्र ....

पावसावर काहीतरी लिहावं म्हटलं ,
घरातून बाहेर पडले तेव्हा वाटलं,
अरे पाऊस म्हणजे लेट झालेल्या ट्रेन,
नाक्यावरचं ट्रॅफिक आणि छत्र्यांची गर्दी....

पावसावर काहीतरी लिहावं म्हटलं ,
समुद्र किनारी फिरताना वाटलं ,
पाऊस म्हणजे प्रेमाची सुरवात....

पावसावर काहीतरी लिहावं म्हटलं ,
शेतात राबणाऱ्या आईला पाहून वाटलं ....
पाऊस म्हणजे हाच मातीचा गंध ,
आणि बीजाला फुटणारा अंकुर,
पण जेव्हा बाबाच्या चेहऱ्यावरचा आनंद पहिला तेव्हा वाटलं
अरे पाऊस म्हणजे बळीराजाचे अश्रू पाहून
त्या मेघराजाला फुटलेला पाझर ....

शनिवार, २ जुलै, २०१६

क्षितीज - संवाद माझा माझ्याशी

संध्याकाळी समुद्रकिनारी सहजच फिरायला आलो. समोर विविध रंगांनी आभाळ रंगून गेलं होत दूरवर जमीन आणि पाणी एकत्र आल्याच पाहिलं आणि बालपणाच्या सर्व आठवणी ताज्या झाल्या "वो बचपन के भी क्या दिन थे ।". 

   लहानपणी जायचो फिरायला दूर बाबा सोबत, कधी समुद्र किनारी,भाजीमंडईमध्ये  तर कधी सहज वाट नेईल तिथे.  मोकळा रस्ता समोर निरभ्र आकाश मजा यायची फिरायला. आणि लहानपणी उत्सुकता असायची ती एकाच गोष्टीची क्षितिजाची. जिथे आकाश आणि भूमी एक होतात  तो भाग म्हणजे "क्षितिज"
आणि बाबा चा हाथ सोडून त्या क्षितिजा मागे धावत जायचो  आणि आईची आठवण यायची अर्थातच इतकं सुसाट धावल्यावर पडणारच ना मग आपसूक तोंडून आई गssss शब्द यायचे आणि थांबायचो।

बाबा नेहमी सांगायचा "अरे, या क्षितिजा मागे धावून नको हो, दिसायला फार सुंदर दिसतं हे आकर्षक, मनमोहक पण लांबूनच.  जितकं जवळ जाशील हे तितकंच लांब जातं.  बघ ना  याच्या मागे धावत धावत किती लांब आलास तू. "
हो खरंच,किती  लांब गेलो होतो मी तेव्हा त्या क्षितिजामागे धावता धावता बाबा मागे आहे हयाचं सुद्धा भान नव्हत मला.

    बघ हो,क्षितिजा मागे धावता धावता मलापण विसरलास,म्हणाला  होता  बाबा.  आणि  मी वळून sorry म्हणालो होतो  तेव्हा , आजही आठवतंय....

    बाबाने तेव्हा किती कमी शब्दात जीवनाचं सार समजावलं होतं.. बस तेव्हा बालबुद्धिला समजलं नव्हतं पण आज सर्व समजत आहे.

    शिक्षणासाठी मुंबईला आलो आणि नंतर इथेच स्थाईत झालो आई बाबा गावीच राहिले. माझं घर घेतल्यावर बोलवलं ही त्यांना एकदा दोनदा  पण ते तिथेच खुश आहेत वाटतं. घर कसलं ते नुसता flat घर तर ते जिथे सर्व गुण्यागोविंदाने राहतात माझे सर्व तर गावाकडेच राहिले . कधीकधी वाटायंच,"राग आला असेल का ?माझा त्यांना. " इतके वर्ष मी साधी विचारपूसही केली नव्हती.  फक्त दर महिना मनीऑर्डर पुरती तार यायची त्यांची तितकाच काय तो संबंध कधी गावी गेलो नाही.सुरवातीला आई फोन करायची पण मला वेळ नसायचा कॉलेज क्लास यातच वेळ जायचा सर्व, मग कंटाळा यायचा आणि बोलायचं राहूनचं जायचं  कॉल बॅक नाहीच केला कधी.

    नंतर नंतर मी माझं  करीयर करण्यात गुंतून गेलो.आणि हळू हळू आईचे फोन पण यायचे कमी झाले आणि शेवटी बंदच. मात्र तार अजूनही सुरूच होती फरक इतकाच कि आधी गावाकडून मनीऑर्डर यायची आणि आता मी दर महिना पैसे पाठवायचो.  आणि आता तर आई बाबाच राहिले नाही मग गावाकडे जायचा प्रश्नच उरला नाही आणि मनीऑर्डर पण बंद .

    आज मी माझं क्षितिज गाठलं माझी सर्व स्वप्न पूर्ण केली  त्या क्षितिजाचा पाठलाग केला .. आज मी सर्जन  आहे.माझं स्वतःच हॉस्पिटल आहे. गरजू लोकांसाठी एक क्लिनिक काढलं आहे. आज सर्व काही आहे माझ्याकडे, पण आई बाबा नाही सोबतीला, नाही जास्त मित्र; संपत्ती खूप कमावली पण आपली माणसं मात्र हरवली. बाबा बरोबर बोलायचा आज समजतंय मला.

    मी वेडा क्षितिजा चा पाठलाग करत राहिलो आणि गाठलं माझं "क्षितिज"  पण  या क्षितिजाचा पाठलाग करता करता खरंच आपली माणसं कधी मागे राहून गेली समजलंही नाही आणि समजलं तेव्हा उशीर झालेला आहे.


सोमवार, ६ जून, २०१६

माणुसकी

सहज पार्क मध्ये चालत होते पार्क तसा शांतच होता वर्दळ होती ती म्हाताऱ्या माणसांची आणि लहान मुलांची , तशी भेळ वाल्याचीही  रेलचेल होतीच पार्क म्हटल कि आलंचं सर्व ,
पण माझं लक्ष वेधून घेतलं ते त्या ब्राह्मण गृहस्थानी तिशी पार केली असेल,शिकलेले दिसत होते. गळयात माळ कपाळावर चंदन लावलेलं.आपल्या लहान भावाला काहीतरी सांगत होते हिंदू मुस्लिम जाती बद्दल. मी काहीशी दूरच होती पण अस्पष्ट असं बोलणं पडत होत माझ्या कानावर ...
मलाही थोडं कुतूहल वाटलं तशी मलाही हौस, जाती धर्मा बद्दल जाणून  घायची म्हणून त्याच्या शेजारच्या बाकावर जाऊन बसले आता त्यांचा संवाद स्पष्ट ऐकू येत होता ,
गृहस्थ:" तुझा तो मित्र आहे ना रे अली त्याच्या पासून थोडा लांबच राहा"
मुलगा:"का रे दादा काय झालं .खूप चांगला मुलगा आहे तो हुशारसुद्धा सलग तीन वर्ष शाळेत पहिला येतो तो शिवाय sports मध्ये पण अव्वल"
गृहस्थ : "ते काहीही असो तुला सांगितलं ना दूर राहायचं"
मुलगा: "अरे पण का ??"
गृहस्थ : "अरे तू ब्राह्मण आहेस आणि तो मुस्लिम .मांस मटन खाणारे ते त्यांच्या पासून दूरच राहा तुलाही बाटवतील आणि लक्षात ठेव तू ब्राह्मण आहेस तुला असं वागणं शोभत नाही ."
मुलगा:"दादा, पण तो खरचं खूप चांगला मुलगा आहे"
मला थोडी चीड येत होती त्या माणसाची या technology च्या काळात देखील असे काही लोक आहेत हे पाहून थोडं वाईटही वाटलं पण त्या मुलाचा विरोध पाहून काहीस मन शांत झालं तितकंचं समाधान उद्याची पिढी तरी जाती भेदाला विरोध करतेय पाहून आनंद वाटला.
तितक्यातच त्या  गृहस्थाना ठसका लागला माझ्या हातात पाण्याची बाटली होतीच मी लागलीच ती पाण्याची बाटली त्यांच्या हातात दिली .
ते ही निसंकोच पाणी प्यायले .
आणि मला त्यांनी माझं नाव विचारलं ,माझं नाव मी सांगितलं "शबाना"
तसा रंगच उडाला त्यांच्या चेहऱ्याचा इतका वेळ जाती बद्दल बोलत असणारे ते गरजेच्या वेळी एका मुस्लिम मुलीने दिलेले पाणी प्यायले कदाचित धर्म भ्रष्ट झाला त्यांचा.  असंच वाटलं असेल त्यांना पण ,त्यांच्या नजरेत अपराधीपणाची भावना दिसली मला.
मीच म्हणाले ,काका , माझा धर्म "माणुसकी" मी माझ्या धर्मच पालन केलं आणि तुम्हाला पाणी देऊन मी तुमचा धर्म बुडवला असेल तर माफ करा  . तो मुलगा मात्र आमच्याकडे पाहत होता त्याच्या मनात काय चाललेलं त्यालाच ठाऊक!

बुधवार, २० एप्रिल, २०१६

It's you

My first thought of the day ..
When I was depressed it's you who encouraged me ...
Yaa its you with whom I like to  share  everything ..
It's you who always love me...
Very important Person in my life is "YOU"..
Who always be with me...
You are the one who cares for me  all the time ...
More than my friend...more than my sister.. It's you my dear mother

Happy mother's day

रविवार, २० मार्च, २०१६

माझा समाज

असा कसा रे समाज  माझा ?
मुलगा झाला म्हणून उत्सव साजरा करणारा तर मुलीला गर्भात मारणारा
आणि स्त्री भ्रूण हत्या रोखा  म्हणून जनजागृती करत फिरणारा  …
असा कसा रे समाज  माझा ?


आईला देव मानणारा आणि तिलाच देवळात जाऊ न देणारा
स्त्री ची पूजा करणारा आणि तिलाच विटाळ समजणारा
असा कसा रे समाज  माझा ?



दाखल्यावर जात लिहणारा आणि शाळेत सर्व धर्म समभाव  शिकवणारा 
आणि भारतीय माझे बांधव म्हणत जातीवादाला बळी पडणारा 
असा कसा रे समाज  माझा ?

मुलाने मुलगी पळवून आणली तर अभिमानाने सांगणारा
आणि स्व:ताची मुलगी पळून गेली म्हणून तिला वाळीत टाकणारा
असा कसा रे समाज  माझा ?


स्त्री स्वतंत्र आहे म्हणत भावनांच्या बंधात तिला जखडणारा,
स्त्री सुरक्षेसाठी झगडणारा आणि तिच्यावरच अत्याचार करणारा 
असा कसा रे समाज  माझा ?

जिवंतपणी अवहेलना करणारा आणि मेल्यावर गोडवे गाणारा 
Smart जगात वावरतानाही अंधश्रद्धेला बळी पडणारा
असा कसा रे समाज  माझा ?

सोमवार, २९ फेब्रुवारी, २०१६

आयुष्य हे असं जगायचं असतं

आयुष्य हे असं जगायचं  असतं 
कधी हसता हसता डोळे भरून येतात ,
तर कधी डोळ्यात दाटलेल्या अश्रूंना 
लपवायला हसावं लागतं ……… 
कधी मनात नसतानाही बोलावं लागतं 
तर कधी बोलायचं असूनही सारे  काही  मनात ठेवावं  लागतं ………. 
आयुष्य हे असं जगायचं  असतं 
कधी हसावं  लागतं ,कधी रडावं लागतं …… 
मुखवटा घालून जगात वावरावं लागतं ......... 
आयुष्य हे असं जगायचं  असतं  ...........